भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
हे झरे चंद्रसजणांचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगावाया
त्या वेली नाजूक भोळ्या
वारयाला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील
जणू अंगी राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी
मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम
मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण
घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई
-कवि ग्रेस
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती
चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती
फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती
हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती
कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती
गीत - मंगेश पाडगावकर
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे
हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले
तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे
स्वये मनात जागते न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे
कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ?
निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे
- शांता शेळके
देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे
जे कोंडीती सार्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या
सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा
स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये
सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां
निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने
जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे
शुभ्र पार्यासारखे ॥
देखणा देहान्त तो
जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो
रात्रगर्भी वारसा ॥
-बा. भ. बोरकर.
१
माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.
२
गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.
३
न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.
४
वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.
५
तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्या
म्हातार्या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.
६
काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.
७
मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?
- अजीम नवाज राही
नंदनने पाठवलेली, त्याला आवडलेली मौज २००८ दिवाळी अंकातली एक कविता.
काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...
-अरुणा ढेरे
गेले दोन पोस्ट्स गाण्यांचे टाकलेत. मागे पण एक टाकलं होतं.
गाणं होण्याआधी - गाण्याच्या शब्दांवर सूर, ताल यांचे संस्कार होण्याआधी त्याचे शब्द म्हणजे एक कविताच असते, अशी मी स्वत:ची समजूत काढली आहे, किंवा पळवाट शोधली आहे म्हणा हवं तर! :) कारण जितका अश्या काही शब्दांवर चढलेला स्वरसाज मला प्रिय आहे, तितकेच ते शब्दही जिवापाड आवडतात! म्हणून इथे पोस्टलेय.
चुकलेलं असेल तर जरा काणाडोळा करा, ही विनंती. :)
केतकीच्या बनी तिथे, नाचला गं मोर
गहिंवरला मेघ नभी, सोडला गं धीर
पापणींत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया, मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला गं, आसावला सूर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातूनी कोणी आज, भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदींत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या, सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला गं, भारला चकोर
-अशोक परांजपे
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
मिटले तसेच लोचन, कि पाकळी हले ना
समजुत मी करावी, म्हणुनीच तु रुसावे
मी हांस सांगताच, रडताहि तु हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
धरिला असा अबोला, कि बोल बोलवेना
का भावली मिठाची अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या, जाणून दूर राहे
चाले अटीतटीने सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना
कि गुढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
रुसवा असा कसा हा ज्या आपले कळेना
अजुनी रुसून आहे, खुलतां कळी खुलेना
-अनिल
पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने
डोळ्यात उतरले पाणी
पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडला पारा
या नितळ उतरणीवरती
पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला
संदिग्ध घरांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्यावरती
लाटांचा आज पहारा
-- ग्रेस
आभाळ जिथे घन गरजे
ते गांव मनाशी निजले
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडले
अन पाणवठ्याच्या पाशी
खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे
कधी हिंडत असतो घोडा
झाडातून दाट वडाच्या
कावळा कधीतरी उडतो
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो
गांवातील लोक शहाणे
कौलावर जीव पसरती
पाऊस परतण्याआधी
क्षितिजेच धुळीने मळती
- ग्रेस
तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते!
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधी तरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशीगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही!
आपल्या हातून निघून गेलेल्या संवत्सरांनी
जाता जाता समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?
-आसावरी काकडे
एकाच या जन्मी जणूं
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील सार्या लयाला व्यथा
भंवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही उदासी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी,
तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळयांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचूनी
माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी
या वाहणार्या गाण्यांतूनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरातुनी उगवेन मी
-सुधीर मोघे
ही रुढार्थाने कविता नव्हे, तर गाणं आहे.
पण ह्या शब्दांवर मी फिदा आहे, म्हणून इथे लिहिते :)
कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ
उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ
मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी
ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ
पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ
-इंदिरा संत
जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।
मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।
हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।
स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
-स्वातंत्र्यवीर सावरकर
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला
-स्वातंत्र्यवीर सावरकर
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।
-स्वातंत्र्यवीर सावरकर
विझवून दीप सारे मी चाललो निजाया
आता अशाश्वताची उरली मुळी न माया
मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे
तेव्हाच शाश्वताचे मी हेरीले इशारे
स्वर-शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणीं
आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी
ध्वनी त्यांतूनी कुणी आगळा निघाला
त्याचाच छंद आता या लागला जिवाला
खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा
लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला
मिळूद्या मला मुळाशी सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हारे
- बा.भ. बोरकर
दूर कुठे राऊळात दरवळतो पूरिया!
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या!
असह्य एकलेपणा, आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या!
दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टीभेटही नसे, काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया!
सलत सूर सनईचा, वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे, मुग्ध भाव लाजरा
फुलात गंध कोंदला, वाट ना उरे तया!
- ग. दि. माडगूळकर
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.
त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न् कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.
कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!
- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४
राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.
अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ...
मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन...
विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...
- इंदिरा संत
एखादी व्यक्ती किती अलवार लिहू शकते याला काही मर्यादा??
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
- बा. भ. बोरकर
एकाच वाक्यात बा. भ. यांच्या काव्यप्रतिभेबद्दल बोलायचं? 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती... ' अजून काय?
आता विश्वात्मके देवे l येणे वाग्यज्ञे तोषावे ll
तोषोनी मज द्यावे l पसायदान हे ll
जे खळांची व्यंकटी सांडो l तयां सत्कर्मी रति वाढो ll
भुतां परस्परे पडो l मैत्र जीवांचे ll
दुरितांचे तिमिर जावो l विश्व स्वधर्मसूर्ये पाहो l
जो जे वांच्छील तो ते लाहो l प्राणिजात ll
वर्षत सकळमंगळी l ईश्वरनिष्ठांची मांदियाळी l
अनवरत भूमंडळी l भेटतु भूतां ll
चला कल्पतरुंचे आरव l चेतना चिंतामणीचे गाव l
बोलते जे अर्णव l पीयुषांचे ll
चंद्रमे जे अलांच्छन l मार्तंड जे तापहीन ll
ते सर्वांही सदा सज्जन l सोयरे होतु ll
किंबहुना सर्वसुखी l पूर्ण होऊनी तिही लोकीं ll
भजि जो आदिपुरुखी l अखंडित ll
आणि ग्रंथोपजीविये l विषेशी लोकी इये l
दृष्टादृष्टविजये ll होआवे जी ll
येथ म्हणे श्रीविश्वेश्वराओ l आ होईल दान पसावो l
येणे वरे ज्ञानदेवो l सुखियां जाला ll
- श्री ज्ञानेश्वरमाऊली
पसायदानाबद्दल मी काय बोलू? माझी तेवढी झेप नाहीच! माझ्या मते पसायदानाची उंची ही केवळ अनुभवायची गोष्ट आहे. त्याची खोली हळूहळू समजू लागते. समजत आहे म्हणता म्हणता, हातातून कितीतरी संदर्भ निसटल्यासारखे वाटतात.
अत्यंत खडतर अश्या आयुष्याला सामोरं जाऊन, त्याला आपलंस करुन, त्या आयुष्याचं केवळ स्वतःपुरतंच नव्हे, तर येत्या कित्येक पिढ्यांसाठी लखलखणारं सोनं करुन ठेवलेल्या संतपुरुषाचे हे शब्द! इतक्या लहान वयात कुठून आली ही ऋजुता? इतके अन्याय सहन करुन एवढी कोवळीक कशी काय जपली ह्या माणसाने? म्हणून ज्ञानेश्वर ही माऊली का? जशी आईच्या मनात केवळ अपरंपार माया असते, तशीच सर्वांभूती जपलेली माया. विश्वाच्या आर्ताचे दु:ख जाणवणारं मन माउलीचंच असू शकत ना?